Sunday, August 30, 2015

ज्ञानदानाचे कार्य सुरूच

तुटपुंजे आर्थिक पाठबळ, अत्यल्प वेतनाअभावी शिक्षकांनी फिरवलेली पाठ, खासगी क्लासेसमुळे विद्यार्थ्यांची घटती संख्या अशा अनेक विवंचनांना तोंड देत 'प्रयत्नेन आपदाम् नश्यति' या विश्वासाने ठाण्यातील 'सुरवाणी ज्ञानमंदिर संस्कृत पाठशाले'चे ज्ञानदानाचे कार्य अविरत सुरू आहे.

संस्कृत भाषा प्रसारण संस्थेची ही पाठशाळा १९५७ पासून संस्कृत भाषेचे शिक्षण देत आहे. हजारो विद्यार्थ्यांनी या पाठशाळेच्या मार्गदर्शानाखाली संस्कृत भाषेत पदवी मिळवली आहे. मात्र आज या शाळेतील विद्यार्थी संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहे. राष्ट्रीय संस्कृत संस्थान, दिल्ली यांच्याकडून शाळेला प्रतिवर्षी १ लाख ४४ हजार रुपयांचे अनुदान मिळते. या अनुदानात केवळ दोन शिक्षकांचा वार्षिक पगार दिला जातो. पण गेली तीन वर्षे हे अनुदानही मिळत नसल्याने पूर्ण आर्थिक भार संस्थेला उचलावा लागत आहे. याबाबत अनेकदा प्रयत्न करूनही कोणतेही उत्तर न मिळाल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहल नांदेडकर यांनी सांगितले. याचबरोबर राज्य शासनाकडून प्रतिवर्षी २५ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. संपूर्ण शाळेचा खर्च भागविण्यासाठी हे अनुदान अपुरे असल्याने त्याबाबत वारंवार प्रयत्न केले जात आहेत. याबाबत शिक्षण व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांना लेखी पत्र दिले असून, त्यांच्याकडूनही कोणतेही उत्तर मिळाले नसल्याचे नांदेडकर यांनी सांगितले.

अत्यंत कमी वेतन हा शाळेपुढील एक मोठा प्रश्न आहे. आर्थिक ताण आणि अनुदानाची कमतरता यांमुळे शिक्षकांना पुरेसे वेतन मिळत नसल्याने शिक्षकांची कमतरता भासते. दरवर्षी महापालिकेच्या शाळेतील सुमारे ५०० मुलांना संस्कृतचे प्रशिक्षण दिले जाते. त्या शाळांमध्ये जाऊन येथील शिक्षक विद्यार्थ्यांना भाषा शिकवतात. अपुऱ्या शिक्षकसंख्येचा ताण या उपक्रमावरही पडत आहे.

खासगी क्लासेसचे स्तोम वाढत असल्याने विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस खालावत असल्याचेही त्यांनी सांगितले. संस्कृत भाषेत करिअरच्या असंख्य संधी उपलब्ध असूनही त्याचा गांभिर्याने विचार होत नाही, त्यामुळे संस्कृत भाषेच्या स्वतंत्र शिकवणीलाही पालकांचा फारसा प्रतिसाद नसल्याचे दिसते. भाषा संवर्धनासाठी पाठशाळेतर्फे होणाऱ्या चर्चासत्र, व्याख्याने यांनाही प्रतिसाद मिळत नाही. संस्थेतर्फे पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षांना बसविण्यात येते. यांसह प्रौढ आणि शिक्षकांसाठी स्वतंत्र संस्कृत भाषा वर्गही चालविले जातात. तसेच लहान मुलांसाठी संस्कारवर्ग आणि गर्भवती महिलांसाठी गर्भसंस्कार केंद्रही चालविले जाते.

सुरुवातीला संपूर्ण दिवस चालणारी ही शाळा सध्या विद्यार्थ्यांअभावी केवळ दोन तासांतच वर्ग बंद करावे लागतात. याबाबत शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहल नांदेडकर म्हणाल्या, 'संस्कृत भाषेत अनेक संधी असूनही या भाषेचा गांभिर्याने विचार होत नाही. पाठशाळेच्या माध्यमातून भाषा संवर्धन करण्याचा प्रयत्न होत असला तरी त्याला आर्थिक पाठबळ नाही. गेली तीन वर्षे संस्थेला अनुदान मिळत नसल्याने मोठ्या आर्थिक ताणांचा सामना करावा लागत आहे. राज्य शासनानेही अनुदान वाढवावे अशी अपेक्षा आहे. मुख्यतः या भाषेकडे पाहण्याचा पालकांचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. तसेच संस्कृत भाषा जाणणारे निवृत्त शिक्षक, विद्यार्थी यांनीही सहकार्य केल्यास संस्कृत भाषेचे सुवर्णयुण पुन्हा अवतरेल.'

No comments:

Post a Comment